क्रीडा गुणांसंदर्भात सहभागाची अट शिथील होणार की नाही या विवंचनेतून खेळाडू विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
क्रीडास्पर्धेत भाग घेणा-या खेळाडूंना शासनाकडून सवलतीचे गुण देण्यात येतात. इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत केंव्हाही जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळला असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात. कोवीडमुळे या वर्षी क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने दहावी आणि बारावीत असताना स्पर्धेत किमान सहभागाची अट शिथील करून विनाअट या वर्षी खेळाडूंना ग्रेसगुण देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समिती, शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे वतीने वेळोवेळी निवेदन देऊन करण्यात आली आहे. पण गेल्या दोन महिन्यात यावर निर्णय झाला नाही. ग्रेसगुणांचे प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी कमी राहीला असून मोठमोठ्या शहरात लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी प्रमाणे प्रस्ताव वेळेत सादर होतील की नाही ही भिती आहे. खेळ सोडून इतर काही विषयांना सवलतीचे गुण देताना क्रीडागुणांसारखी दहावी-बारावीत सहभागाची अट नसून कोणत्याही वर्षी परीक्षा दिली तरी गुण मिळतात.मात्र ही क्रीडा गुणांसंदर्भात सहभागाची अट शिथील होणार की नाही या विवंचनेतून खेळाडू विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. या वर्षी स्पर्धा होऊ शकल्या नसल्याने राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीवर पाणी फेरले गेल्याने वर्षानुवर्षाची मेहनत वाया गेल्याने अगोदरच खेळाडूत अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यातच सहभागाची अट शिथील न झाल्यास ग्रेसगुणांपासून खेळाडू वंचित राहतील. त्यामुळे शासनाने विना अट ग्रेसगुण द्यावेत अशी मागणी क्रीडा संघर्ष समितीनं केली आहे.