कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासह कोरोना लढयात परिवहन सेवेतील शेकडो कर्मचारी गेल्या अडीच महिन्यापासुन अविरत झटत आहेत. कोरोनाच्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एका टीएमटी चालकाचा नुकताच कोरोनाची लागण झाल्याने दुर्दैवी मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर कोरोना लढयात शहीद होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वारसांना नवीमुंबई महापालिकेच्या धर्तीवर 50 लाख, कामगार कल्याण निधीतुन 25 लाख, मृत कर्मचाऱ्याच्या पात्र वारसांना तातडीने परिवहन सेवेत नोकरी देऊन भविष्य सुकर करावे अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियननं केली आहे. ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणे मनपाच्या रुग्णवाहिका, शववाहिका तसेच अम्निशमन दल, निर्जंतुकीकरण फवारणी त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याकरीता सुमारे 150 हून अधिक टीएमटी चालकांची नेमणुक केली आहे. याशिवाय देखरेख करणे, वाहनांची देखभाल-दुरुस्तीसाठीही टीएमटी कर्मचारी कार्यरत आहेत. यातील रुग्णवाहिकेवर नियुक्त केलेल्या विलास पाटील या चालकाचा कोरोनाची लागण झाल्याने काल सफायर रुग्णालयात दुर्दैवी मृत्यु ओढवला. त्यामूळे या शहिद कर्मचाऱ्याचे कुटुंबिय वाऱ्यावर पडले आहे. तेव्हा,नवीमुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्किम फॉर हेल्थ वर्कर्स या केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत 50 लक्ष आणि कामगार कल्याण निधीतुन 25 लाख तसेच,मृत कर्मचाऱ्याच्या पात्र वारसांना तातडीने परिवहन सेवेत नोकरी देऊन भविष्य सुकर करावे अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.