कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यास गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी अशी या दोघा मृत मुलांची नावे आहेत. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी दोन्ही मुतदेह काल शोधून काढले. दोन्ही मुले शनिवार दुपारपासून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा पर्यन्त घरी न परतल्याने या दोन्ही मुलांच्या पालकांनी हे दोधे हरवल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मात्र त्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी हे दोघेही जण कोपरीच्या सुभाष नगरमध्ये राहतात. हे दोघे शनिवारी दुपारी कोपरी येथील मिठागर खाडीत घरी न सांगता पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते उशिरा पर्यन्त घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला होता. बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला असता दोघांचे कपडे खाडी किनारी आढळून आले होते. त्यानंतर ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला होता. यावेळी काल दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. कोपरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.