भारतीय हवामान विभागाने येत्या तीन ते चार दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाने आज जारी केलेल्या सुचनेनुसार, विदर्भासह कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा प्रभाव राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पर्यंत ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना व समुद्रकिनाऱ्यावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी केले आहे.