केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी आज ठाणे रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असे एकूण कार्यक्रमा दरम्यान पाहायला मिळाले. अनेक वर्षानंतर केंद्रीय मंत्री ठाण्यात आल्यामुळे जोरदार कार्यक्रम करण्यात आला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक स्थानिक नेते या दौर्यात सहभागी झाले होते. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यांचं तुतारीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय रेल्वेमंत्री ठाणे रेल्वे स्थानकात येणार असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात साफसफाई तसंच काही भागाला रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र या दौऱ्याच्या आधीपासूनच काही निर्बंध लागू केल्यामुळे प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली. रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी उपनगरे गाडीतून ठाणे ते दिवा आणि दिवा ते पुन्हा ठाणे असा प्रवास केला आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. ठाण्यात आल्यावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेस्थानकात चहाचा आस्वाद घेतला.