हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तसेच महानगरपालिका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाबरोबरच एनडीआरएफ, आपदा मित्र, टीडीआरएफची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००