कारगिल विजयदिनाचे औचित्य साधत 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. ठाणे जिल्ह्यात 20 वा कारगिल युध्द विजय दिन आणि माजी सैनिक संम्मेलन कार्यक्रमाचे नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.या वेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहिद जवान स्मृती प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा, युध्द विधवा, माजी सैनिक संघटना यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 30 सिंधी बांधवाना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आणि आमदार गुरुमुक जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी ठाण्यातील वीर पत्नी श्रीमती मीरा देवी, श्रीमती सत्याराणा, श्रीमती बेबी जोन्ह सी, सुप्रिया आंब्रे यांना सन्मानित करण्यात आले. तर कारगिल युध्दात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी कारगिल शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.