ठाणे महापालिकेचं कळवा रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे. ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणा-या २२ वर्षीय गर्भवती महिलेची सीझेरियन प्रसुती झाली होती. त्यानंतर तिचा आज सकाळी मृत्यू झाल्यानं तिच्या नातेवाईकांनी कळवा रूग्णालयात गोंधळ घातला. या महिलेच्या प्रसुतीनंतर तिचे बाळ ८ महिन्याचे असल्यानं पूर्ण वाढ न झाल्यानं त्याला धन्वंतरी या खाजगी रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र वनिता यांची प्रकृती चांगली होती. तिचे पती आणि वडील घरी गेल्यानंतर तिचे निधन झाल्यानं फोन करून तिच्या नातेवाईकांना रूग्णालयातून कळवण्यात आलं. त्यामुळं नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांना जाब विचारत गोंधळ घातला. वनितावर उपचार करणा-या शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वनिताचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रूग्णालय प्रशासनानं मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. वनिताची प्रकृती नाजूक होती आणि याची माहिती तिच्या नातलगांना देण्यात आली होती असं रूग्णालयातर्फे सांगण्यात आलं.