कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगांव-बदलापूर महापालिकेसाठी प्रत्येकी अनुदान स्वरुपात ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनाची उत्कृष्ट सुविधा प्रत्येक नगरपालिकेने निर्माण केली आहे. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरपालिकेकडे निधी अपुरा पडत असल्याची बाब कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर महापालिका आणि नगरपरिषद आयुक्तांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील नगरपालिकेच्या स्वउत्पन्नाचा स्त्रोत तुटपुंजा आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांवर उपाययोजना करण्यासठीनिधीची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. सध्याची वाढत्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारावर अधिक खर्ची पडेल असे अपेक्षित असल्याने सबब विवेचन विचारात घेऊन मनपा क्षेत्रास वैशिष्ठपूर्ण अनुदानामधून कोरोनारुग्णांच्या व्यवस्थापनासाठी ५ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी श्रीकांत शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून त्यास अखेर मंजुरी मिळाली आहे.त्यानुसार राज्यात कोविडचा प्रादुर्भाव उद्भवला असल्याने त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदेस मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर-कुळगांव नगरपरिषदेस ५ कोटी निधीची तरतूद केल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.