वेळेवर वेतन नाही, कामाची शाश्वती नाही, अशा अडचणीमध्ये पिचलेल्या ठाणे, मुंबईसह अन्य भागातील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामगारांनी एकत्र येत सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातील पुरग्रस्तांना त्यांनी गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला आहे. सांगली जिल्हयात महापुराने थैमान घातले होते. यामुळे येथील घरेदारे, गुरे-ढोरे, सारा संसार वाहून गेला. होत्याचे नव्हते झाले. या पुरग्रस्तांना महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने एक हात मदतीचा दिला आहे. याव्दारे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यातील गरजु पुरग्रस्तांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन सक्रिय मदत करण्यात आली.