ई- पॉस बायोमेट्रीक पडताळणीची अट शिथील केल्याने कोरोना संसर्गाचा धोका टळला आहे.
राज्यात कोरोनोंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे,मुंबईसह अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशातच केंद्र शासनाकडून ई-पॉसवरील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्यवाटप करण्याचे निर्देश दिल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची धास्ती रेशन दुकानदारांना भेडसावत होती. याबाबत रेशन दुकानदारांना कोरोनाची धास्ती असे वृत्त प्रसिद्ध होताच संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारने तातडीने दखल घेतली. तसेच 31 मे पर्यत ई- पॉस बायोमेट्रिकची अट शिथिल करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे रेशन दुकानदारांची चिंता तुर्तास मिटली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्यांचे बायोमेट्रीक पडताळणी न करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु,केंद्र शासनाकडून ई-पॉसवरील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्य वाटप करण्याचे निर्देश देण्यात आल्याने मे महिन्यात लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पडताळणी करुनच धान्य मिळणार होते.यामुळे लाभार्थ्यासह रेशन दुकानदारांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती निर्माण झाली होती.याबाबत, आवाज उठवल्यांनतर सरकारला जाग आली.आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत मे महिन्यात रेशनद्वारे अन्न-धान्याचे वाटप करताना ई-पॉसची बायोमेट्रिकची अट शिथील करण्यात आली.त्यामुळे,लाभार्थ्यांना अंगठा न दाखवताच धान्य मिळणार आहे.मात्र,अन्य ठिकाणच्या लाभार्थ्याना पोर्टेबिलीटीद्वारे धान्य वितरीत करताना लाभार्थाचे आधार कार्ड प्रमाणीत करून ई पॉस उपकरणादवारे कोविड सुरक्षिततेचे पालन करून धान्य द्यायचे निर्देशित केले आहे.