स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ईट राइट चॅलेंज 2 या उपक्रमांतर्गत पोषणतत्त्व गुणसंवर्धीत अन्नाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिलेट्स विषयाच्या व्याख्याता विद्या क्षीरसागर, पाथ संस्थेचे निलेश गंगावारे, एएचपीटी संस्थेचे जालिंदर शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी आणि जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका/सेविका, हॉटेल आणि स्वीट मार्टचे अन्न व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यक्रमात फोर्टिफाईड तांदळाविषयी माहिती देण्यात आली. फोर्टीफाईड तांदुळ हा नेहमीचाच तांदूळ असून 100 दाणे तांदळाचे आणि 1 दाणा पोषणतत्व गुणसंवर्धन केलेला या प्रमाणात असतो. तसेच ‘प्लास्टिक तांदूळ आणि प्लास्टिक अंडे’ हे अस्तित्वात नसून त्यांनी पोषणतत्तव गुणसंवर्धन तांदळाबद्दलची माहिती दिली. पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ कार्यक्रमाबद्दल विस्ताराने सांगताना पाथ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे निलेश गंगावारे यांनी भारतात तसेच महाराष्ट्रात एनिमिया आणि बालकांमधील वाढत्या कुपोषणाची समस्या अधोरेखित केली. या तांदळात लोह,फॉलिक ॲसिड, बी-12 जीवनसत्व असतात तसेच 6 ऐच्छिक पोषकतत्वे टाकली जाऊ शकतात. या तांदळामुळे महाराष्ट्रातील एनिमियाच्या वाढत्या प्रभावास आळा बसण्यास मदत होईल असे गंगावारे यांनी सांगितले. या कार्यक्रमात डॉ.विद्या क्षीरसागर यांनी दैनंदिन आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी पदार्थांचा आवर्जून समावेश करावा असे सांगितले. असंख्य भरडधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तृणधान्ये केवळ भाकरीसाठीच वापरता येतात असे नाही, तर त्यापासून उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी, असे अनेक पदार्थ करता येतात, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात व्यसन मुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करीत असल्याची शपथ देण्यात आली.