आर्थिक क्षमता कमी असली तरी बुध्दीच्या भांडवलाच्या जोरावर वकीली क्षेत्रात यशस्वी होता येतं असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यु डी साळवी यांनी ठाण्यात बोलताना दिला. विधी फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित डॉ. प्रभाकर हेगडे व्याख्यानमालेत ते बोलत होते. न्यायमूर्ती आणि वकील यांच्यातील फरक सांगताना ते म्हणाले की न्यायाधीश न्याय देतात तर वकील हे न्याय देण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. अशावेळी आपल्याला जे मांडायचं आहे ते कमीतकमी शब्दात मांडावं असं त्यांनी सांगितलं. न्यायमूर्ती कसा झालो हे सांगताना त्यांनी रमाकांत ओवळेकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचा उल्लेख केला. यावेळी संदेश पाटील यांनी जामीन आणि त्याबाबतच्या कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. तर भारतीय दंड संहितेतील गुन्हे, विशेष कायदे, एनडीपीएस अशा कायद्यातील गुन्हेगारांना जामीन मिळण्यातील फरक समजून सांगितला. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे निवाडे अभ्यासावेत, वकीलीचा अभ्यास करताना बारकावे समजून घेणं महत्वाचं असल्याचं संदेश पाटील यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ गजानन चव्हाण आणि ए आर जयमलानी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन न्यायमूर्ती साळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. येत्या काही वर्षात न्यायनिवाडे लिहिण्यावर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल असं विधी फाऊंडेशनच्या संजय म्हात्रे यांनी जाहीर केलं. ठाणे विधी महाविद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी हे न्यायिक क्षेत्रात असल्याचं ठाणे महापालिका विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीविद्या जयकुमार यांनी सांगितलं. यावेळी विधी महाविद्यालयातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.