आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब असल्याचं प्रतिपादन कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम यांनी ठाण्यात बोलताना केलं. साहित्य अकादमी, मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या वतीनं भारतीय साहित्यिकांवरील लघुपटांचं संयुक्त आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्घाटनपर भाषणात किशोर कदम यांनी हे प्रतिपादन केलं. साहित्य अकादमीचे साहित्य वेगवेगळ्या भाषेत आहे. इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचं मराठी भाषेत झालेल्या अनुवादाचं काम महत्वाचं आहे. याबरोबरच डॉक्युमेंट्रीचे साहित्य अकादमीचे कामही महत्वाचे आहे. डॉक्युमेंट्री लोकांसमोर प्रभावीपणे चित्र उभं करते. सत्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते. जॉर्ज बुश, लादेन यांच्या कुटुंबातील संबंध दर्शवणा-या रॉजर बूर यांच्या डॉक्युमेंट्रीकडे या दृष्टीनं पाहता येईल. हॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या बरोबरीने डॉक्युमेंट्रीला स्थान आहे. भारतात अनंत पटवर्धनांनी हा प्रयत्न केला आहे. मनोरंजनाच्या पलिकडे जाणारा, सत्य सांगणारा र. धो. कर्वे यांचा डॉक्युड्रामा, धर्मवीर भारती, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, गिरिश कर्नाड, महेश एलकुंचवार, गुलजार, भालचंद्र नेमाडे या डॉक्युमेंट्रीही आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतात असं किशोर कदम यांनी सांगितलं.