सूर्याने सायन मकर राशीत आज पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रवेश केला आहे. हीच सायन मकरसंक्रांती आहे. आजपासूनच उत्तरायणारंभ झाला आहे. शिशिरऋतूचा प्रारंभही आजपासूनच होत आहे. आजपासूनच दिनमान हळूहळू वाढत जाणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून उत्तर गोलार्धात दिनमान वाढू लागते. काही विद्वानांच्या मते उत्तरायणाचा आरंभ हा पूर्वी वर्षारंभाचा दिवस असावा. कारण याचदिवशी शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. महाभारतात एके ठिकाणी ” ऋतव: शिशिरादय: ” असे म्हटलेले आहे. कालांतराने यांत बदल झाला असावा. वसंत ऋतू हा वर्षारंभाचा पहिला ऋतू मानला गेला असावा. पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने संक्रांत ही निरयन मकर राशी प्रवेशाप्रमाणे साजरी केली जाते. वास्तविक सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पासून दिनमान वाढत जात असते. म्हणून हाच उत्तरायणायणारंभाचा – शिशिरऋतू प्रारंभाचा दिवस महत्वाचा असतो. हीच संक्रांती जास्त महत्त्वाची असल्याचंही सोमण यांनी सांगितलं. क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त जेथे एकमेकाला छेदतात, त्या बिंदूना वसंत संपात आणि शारद संपात बिंदू म्हणतात. वसंत संपात बिंदू हा स्थिर नाही.तो दरवर्षी ५० विकलांनी मागे सरकतो. वसंत संपात बिंदूपासून जर राशिविभाग कल्पिले तर त्याना सायन राशी म्हणतात. परंतू संपात बिंदू स्थिर नसल्याने राशीविभाग आणि प्रत्यक्ष तारका यांमध्ये फारकत होईल. म्हणून क्रांतिवृत्तावरील चित्रा तारकेचा समोरचा १८० अंशावरचा प्रारंभ बिंदू मानून राशिविभाग कल्पिण्यात आला त्याना निरयन राशी म्हणतात. आपली पंचांगे निरयन राशीचक्रावरच आधारित असतात असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.