जिल्ह्यातील पिकाचे अवकाळी पावसानं नुकसान झालं आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे २५ हजाराहून अधिक हेक्टरवरील भाताचे नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. क्यार वादळामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सध्या या नुकसानीचे कृषी यंत्रणेमार्फत पंचनामे केले जात आहेत. शहापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यानंतर भिवंडी, मुरबाड या तालुक्यात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या जमिनीवरील पिकाचे सध्या पंचनामे केले जात आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं दिसत आहे. राजकीय नेतेमंडळी सध्या सत्ता स्थापनेसाठी धडपडत असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे शेतकरी झालेल्या नुकसानातून बाहेर कसं पडायचं या विवंचनेत आहेत.