राज्यातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं सुरू झाला असून या बाजारात अवघ्या दोन तासात ५०० किलो भाज्यांची विक्री झाली. ही माहिती या बाजाराच्या प्रमुख सुरेखा जाधव यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक यांच्या हस्ते या बाजाराचं उद्घाटन झालं. हा बाजार उमा निळकंठ व्यायामशाळेत दर शुक्रवारी साडेचारला भरणार आहे. या बाजारात महिलांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती. कांदा, बटाटा, लसूण, आलं, मेथी, कोथिंबीर, पालक, मुळ्या शेंगा, घेवडा, वांगी, दुधी, टोमॅटो, गाजर, भेंडी, फ्लॉवर, मटार अशा फळभाज्यांची विक्री झाली. शेतकरी आणि ग्राहक यांची थेट भेट होऊन दलाल निघून गेल्यानं या बाजारांचा शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे. आमदार केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून गावदेवी मैदान, कोलबाड, एसआरए कार्यालय, आकाशगंगा, राबोडी, उन्नती गार्डन, शिवाईनगर, वेदांत कॉम्प्लेक्स, वर्तकनगर अशा विविध ठिकाणी सध्या आठवडी बाजार सुरू आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/03/20190301_1744040-e1551523692896.jpg)