ठाणे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. ठाणे महापालिकेमार्फत स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहराला २१० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणी पुरवठा केला जातो. स्टेम कंपनीमार्फत मानकोली जलसंतुलन टाकीत १०० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणी घेतलं जातं. गुरूवारी स्टेम कंपनीचा विद्युत पुरवठा चार वेळा खंडीत झाल्यानं स्टेम कंपनीकडून मध्यरात्री १ ते ३ या कालावधीत पाणी पुरवठा बंद होता. त्यानंतर रात्री ३ ते सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आलेला पाणी पुरवठा पूर्णत: गढूळ आणि दूषित स्वरूपाचा होता. मात्र काल सकाळपासून शुध्द स्वरूपाचा पाणी पुरवठा करण्यात आल्यानं शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/09/water_supply.jpg)