जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफार नोंदी आता संगणकीकृत होत असून या ई-फेरफार नोंदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी येत्या 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. डिजिटल इंडिया भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ई-फेरफार नोंदीचे काम सुरू आहे. ई-फेरफार प्रणालीमुळे जनतेला अचूक ऑनलाईन सातबारा आणि आठ अ उतारा मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सर्व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची तालुकानिहाय समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांना अचूक नोंदी असलेला ऑनलाईन गाव नमुना नं. सातबारा उतारा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जमिनींच्या नोंदीची अद्ययावत माहिती मिळणार आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांनी तालुका स्तरावरील शिबीर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले आहे.