जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील ग्रामीण भाग आता शाश्वत स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराबाबत सकारात्मक जागृती व्हावी यासाठी स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणीच्या दुस-या टप्प्याला प्रारंभ करण्यात आला आहे. यासंदर्भात एका जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन डॉ. रूपाली सातपुते यांच्या हस्ते झालं. स्वच्छता हा संस्कार असून प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्यक्ष कृतीत त्याची रूजवण व्हायला हवी. स्वच्छतेमध्ये जिल्ह्याचं काम उत्तम असून दुस-या टप्प्यातील काम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं काम करायला हवं असं आवाहन रूपाली सातपुते यांनी यावेळी केलं. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात २ ऑक्टोबरला ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये इनसिनेटर बसवणं, एक शोषखड्ड्यांचे शौचालय असलेल्या आणि खड्डा पूर्ण भरलेल्या तसंच सोनखत तयार झालेल्या शौचालयाची निवड करणं, एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्ड्याचे शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करणं तसंच ग्रामपंचायत स्तरावरील सफाई कर्मचा-यांना स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे.