नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कल्याण फाटा ते दहीसर फाटा पर्यंतच्या जुन्या जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या १४ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून जानेवारी २०१४ मध्ये ६ कोटी ४२ लाखांचं काम मंजूर झालं होतं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करत होतं. मात्र हे काम अत्यंत कूर्मगतीनं सुरू असल्यामुळं या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. खासदार श्रीकांत शिंदे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी ५ वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत होते. या गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी १९९८-९९ मध्ये टाकण्यात आलेली जलवाहिनी आता जीर्ण झाली आहे. पाण्याच्या दाबानं वारंवार ती फुटत असते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं २ कोटी ३५ लाखांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता पण तो निर्धारीत वेळेत सादर न केल्यामुळं शासनानं फेटाळला. त्यामुळं आता मूळ योजनेतील शिल्लक असलेला अडीच कोटी रूपयांचा निधी वापरून नवी जलवाहिनी टाकण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/02/IMG-20190220-WA0056.jpg)