श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. जन्म देणारी माता ही मोठी असल्याचं बिंबवण्यासाठी लहानपणापासूनच मातृदिन साजरा केला जातो. भविष्योत्तर पुराणात मातृदिनाविषयी एक कथा आहे. पार्वतीनं इंद्रायणीला हे व्रत आचरण्यास सांगितलं होतं. हे व्रत आचरणात आणल्यामुळं संतती, सौभाग्य आणि ऐश्वर्य मिळतं. अनेक वर्षापूर्वी श्रीधर आणि सुमित्रा यांचा ज्येष्ठ मुलगा शंकर त्याची पत्नी विदेहा ही दर श्रावण अमावास्येलाच प्रसुत होत असे. मात्र प्रसूत झाल्या झाल्या तिचं मूल दगावत असे. तिच्या सासू-सास-यांचाही याच दिवशी श्राध्द दिन असे. मात्र घरात असा प्रकार घडत असल्यामुळं तिला सासू-सास-यांचं श्राध्द करता येत नसे. यामुळं पितरांचा उध्दार होत नाही अशी भावना तिच्या मनी निर्माण होत असे. असंच एकदा श्रावण अमावास्येला तिला पुन्हा मूल झालं मात्र यावेळी तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं. एका ठिकाणी फिरता फिरता ती अरण्यात गेली. त्यावेळी तिला त्या ठिकाणी ६४ देवता येतात अशी माहिती मिळाली. या देवतांचं दर्शन घेतल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात. तिलाही या देवतांचं दर्शन झालं. त्यामुळं तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तिला ८ दीर्घायुषी पुत्र झाले अशी कथा आहे. मातृदिनाचं व्रत म्हणजे सकाळी उपवास करून पहिल्या प्रहरी ८ कलशात ब्राह्मणी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, माहेश्वरी, चामुंडा या देवतांच्या प्रतिमा स्थापन करून त्यांची आराधना केल्यास ऐश्वर्य आणि पुत्रप्राप्ती होते. यावेळी घरातील माहेरवाशिणीला पुरणाची पोळी वाण म्हणून दिली जाते अथवा खीर त्यावर झाकलेली पुरी, पुरण ठेवून ते मुलीला वाण देण्याची काही ठिकाणी पध्दत आहे.