विद्या प्रसारक मंडळाचे टिएमसी विधी महाविद्यालयने शहरातील दोन राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिका-यांच्या सत्कार केला. प्रांगणातील पाणीनी सभागृह इथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक हर्षद अहिरराव यांना नुकतेच ‘कारागृह सुधार कार्यासाठी’ राष्ट्रपती पदक देण्यात आले तर नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजय धुमाळ यांना त्यांच्या कामगिरीनिमित्त राष्ट्रपती पदक देण्यात आले होते. याचेच औचित्य साधुन हा सत्कार समांरभ आणि डॉ. वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेनिमित्त “कारागृह कायदा आणि सुधार’ या विषयावर हर्षद अहिरराव यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर होते. अध्यश्रीय मनोगतामध्ये डॉ. बेडेकरांनी नागरीकांना कायदा पाळण्याचे आवाहन केले. जर नागरीकांनी कायदा पाळला तर आपोआपच पोलिसावरचा ताण कमी होवुन गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याना आळा घालण्यास पोलिस सक्षम होवु शकेल.
सत्काराला उत्तर देतांना धुमाळ यांनी त्यांच्या यशाचे क्ष्रेय त्यांच्यासोबत काम करणा-या पोलिस अधिका-यांना दिले. नौपाडा जेव्हा एका इमारतीला आग लागली होती तेव्हा धुमाळ यांनी १९ जणांचे प्राण वाचविले होते, तो प्रसंग त्यांनी जिवंत केला. पोलिसांनी सामाजिक जाण आणि कायद्याचे ज्ञान दोन्ही बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरे सत्कारमु्ती अहिरराव यांनी बंद्याचे मानसशास्त्र उलगडुन, कारागृहातुन घरी जातांना गुन्हेगार चांगला होवुन कसा जाईल यासाठी सुधार आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी स्वत: कारागृहामध्ये केलेल्या सुधारणेचा उल्लेख केला. शिक्षण, आहार, आरोग्य, मोफत विधी सेवा, प्रशिक्षण, प्रार्थना, शिस्त अश्या अनेक बाबतीत त्यांनी सुधारणा केल्या आहेत. अनेक बंदी शिक्षा संपवुन जेव्हा घरी जातात तेव्हा याच सुधारणा त्यांना चांगला नागरीक होण्यास मदत करतात. गुन्हेगारामध्ये सुधारणा घडवुन आणणे हेच कायद्याला अपेक्षित कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयाकुमार यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. प्राध्यापक विनोद वाघ यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी मंडळाचे सदस्य डॉ. महेश बेडोकर आणि श्री. कयाल उपस्थित होते.