मुंबई-दिल्ली राजधानी गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. ठाणे हे निवासी तसंच व्यावसायिक दृष्टीनं अति झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून उदयास आलं आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे ठाणे महापालिका क्षेत्र, नवी मुंबई तसंच मध्य रेल्वेवरील घाटकोपर ते दिवा या स्थानकांना मध्यवर्ती असे स्थानक आहे. या भागातून उत्तरेकडे जाणा-या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मुंबई-दिल्ली राजधानी गाडीस ठाण्यात थांबा दिल्यास प्रवाशांना ते लाभदायक होईल. त्यामुळं ठाण्यात या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे.