कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, रुग्ण संख्या आणि खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्ण यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सध्या ठाण्यात कोरोनाचे एकूण २५२ रुग्ण आहेत. कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून ०५ कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल तज्ज्ञांचे मत घेतले असता असे दिसून येते की, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, इतर गंभीर सहव्याधी यांच्यासह कोविडमुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त बांगर यांनी बुधवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सगळ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करून रुग्ण संख्येचा अभ्यास करणे हे कोरोनाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. चाचण्या अधिक केल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कोविडबाबतच्या ‘चाचणी, विलगीकरण, उपचार’ या प्रोटोकॉल प्रमाणे अधिकाधिक रुग्ण विलगीकरणात ठेवणे आणि उपचार करणे आवश्यक ठरते. त्यामुळे, चाचणी केंद्रे एकही दिवस बंद ठेवू नयेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल आदी ठिकाणी चाचणीची व्यवस्था तत्काळ केली जावी, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्ड बरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कोविड काळात नेमण्यात आलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांची सेवा तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.