राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मराठी शाळांची पाटी कोरी राहिली आहे तर ठाण्यातून ३ प्रकल्प राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडले गेले आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यात राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद झाली. या परिषदेच्या माध्यमातून ३० प्रकल्पांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली असून यातील ३ प्रकल्प ठाण्याचे आहेत. बालविज्ञान परिषदेच्या २७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मराठी माध्यमाच्या शाळेतील एकाही प्रकल्पाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली नाही ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया बालविज्ञान परिषदेचे राज्य आयोजक सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केली. राज्यातील ३२ जिल्ह्यातून सुमारे ३ हजार २०० प्रकल्पांची यावर्षीच्या बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली होती. सर्व जिल्ह्यातील निवडक २१२ प्रकल्पांची राज्यस्तरीय चाळणी परिक्षणासाठी निवड झाली. यातील निवडक ८४ प्रकल्प राज्यस्तरीय परिषदेमध्ये प्रत्यक्ष सादर केले गेले. केरळमधील त्रिवेंद्रपुरम् येथे होणा-या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे २ तर भगवती हायस्कूलच्या एका प्रकल्पाची निवड झाली आहे. सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या मॉस्किटो रिपेलण्टस् या ऋचा देव आणि अदित तांबे तसंच हेअरडाय या नई गाडा आणि वंश अजमेरा यांच्या प्रकल्पाची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. तर आर्यन पेडणेकर आणि चैतन्य भारे यांच्या ॲनेलिसीस ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड स्ट्रेस अमंग द स्टुडंटस् या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय प्रकल्पासाठी झाली आहे.