फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि नंतर तेवढीच धुवांधार फलंदाजी करत जान्हवी काटेने विजय क्रिकेट क्लबला एकहाती विजयासह अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला २० षटकात ९६ धावांत रोखल्यावर ११.३ षटकात ३ बाद ९७ धावा करत विजय क्रिकेट क्लबने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सेंट्रल मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमृता परबच्या नाबाद ३२ धावांच्या खेळीमुळे कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला चार फलंदाजांच्या मोबदल्यात ९६ धावांपर्यंत मजल मारता आली. विधी कदमने १७ तर दृष्टी राणेने नाबाद १४ धावा केला. जान्हवीच्या जोडीने बतुल परेरा, हिमजा पाटीलने अचूक गोलंदाजी करत प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल जान्हवीने ३६ चेंडूत अकरा चौकार आणि दोन खणखणीत षटकांरासह नाबाद ६७ धावांची खेळी करत संघाला ७ विकेट्सनी मोठा विजय मिळवून दिला. रिया चौधरीने १० धावा केल्या. गौरी चव्हाणने चार धावात दोन विकेट्स मिळवल्या. आक्षी गुरवने एक विकेट मिळवली. जान्हवीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक –
कामत मेमोरियल क्रिकेट क्लब : २० षटकात ४ बाद ९६ ( अमृता परब नाबाद ३२, विधी कदम १७, दृष्टी राणे नाबाद १४, जान्हवी काटे ४-११-१, बतुल परेरा ३-१६-१, हिमजा पाटील ४-२३-१) पराभुत विरुद्ध विजय क्रिकेट क्लब : ११.३ षटकात ३ बाद ९७ ( जान्हवी काटे नाबाद ६७, रिया चौधरी १०, आक्षी गुरव ३-१८-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – जान्हवी काटे.