ठाणे जिल्हा प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात राज्यात सलग तिस-यांदा प्रथम क्रमांकावर आला असून राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण २४ हजार ७३ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर प्रलंबित प्रकरणांत ७६ कोटींची तडजोड झाली. राष्ट्रीय अदालतीमध्ये दाखलपूर्व ६ हजार ६२५ प्रकरणे निकाली. दाखलपूर्व प्रकरणांत १२ कोटी इतक्या रक्कमेची तडजोड झाली. एकूण ३० हजार ६९८ प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं निकाली काढण्यात आली असून एकूण ८८ कोटी इतक्या रक्कमेची तडजोड झाली. अशी माहीती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. या लोकअदालतीमध्ये तुरुंगात बंदी असलेल्या कैद्यांच्या प्रलंबित प्रकरणांस प्राधान्य देण्यात आले. लोकअदालतमध्ये ई-फायलिंग प्रणालीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. विनाकागदपत्रांची ई-फायलिंग प्रकरणांमध्ये ई-व्हेरीफीकेशन करण्यात येवून एकूण ४६ प्रकरणे ई-निकाली काढण्यात यश आले. जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला तर १० ते १५ वर्ष जुने असंख्य प्रकरणे निकाली निघाली. वैवाहीक प्रकरणे तडजोडीस मोठया प्रमाणात यश आलं असून अनेक संसार जुळले. मोटार अपघातांच्या २३५ प्रकरणांमध्ये तडजोड होवुन रूपये १८ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ठाणे मुख्यालयात १६२ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होवुन रूपये १२ कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली. कल्याण तालुका न्यायालयामध्ये २२ मोटार अपघात प्ररकणांमध्ये तडजोड होवुन रूपये १ कोटींची नुकसान भरपाई मंजूर झाली. दाखलपूर्व बँक रिकव्हरीची एकूण १६७ प्रकरणे निकाली असून ७२ लाखांची तडजोड झाली. लोकअदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंदयांची प्रकरणे ठेवुन कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास ५५ बंदयांची कारागृहातुन सुटका करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असुन जवळपास ४३७ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम जमा केली.