ठाण्यातील एका दाम्पत्यानं मुलाच्या मृत्यू प्रकरणात मिळालेली नुकसान भरपाई सामाजिक संस्थेस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलाचा एका अपघातात २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र आपलं दु:ख न कवटाळत बसता त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम सामाजिक संस्थेस देण्याचा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आदिवासी आणि गरिब मुलांसाठी एक विश्वस्त संस्था उभारून त्यांना मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या २१ वर्षीय मुलाचा ३० जून २०१८च्या संध्याकाळी भांडूप पंपिंग स्टेशनजवळ एका पार्टीतून येताना दुचाकी घसरून दुभाजकाला धडकली आणि दुस-या बाजूला जाऊन पडली. त्याचवेळी एका कंटेनरखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर या दाम्पत्यानं ५० लाखांची नुकसान भरपाई मागणारा दावा मोटार अपघात प्राधिकरणात दाखल केला होता. नुकत्याच झालेल्या लोक न्यायालयात मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य आर एन रोकडे यांनी हे दाम्पत्य आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीमध्ये तडजोड करून आणत २७ लाख ३० हजारांची नुकसान भरपाई मंजूर केली. याप्रकरणी या दाम्पत्याच्या बाजूनं प्रदीप टिल्लू यांनी तर विमा कंपनीतर्फे के व्ही पुजारी यांनी काम पाहिलं. या दाम्पत्यानं नुकसान भरपाईची रक्कम दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळं टिल्लू यांनीही या दाव्यापोटी एक पैसाही आकारला नाही.