मी टू मुळे एका अधिका-याला आपला जीव गमवावा लागण्याची घटना ठाण्यात घडली. कंपनीतील आपल्या सहकर्मचारी महिलेचा विनयभंग करण्याच्या प्रकरणात जामिनावर मुक्त झालेल्या अभिषेश शर्मा याने राहत्या इमारतीच्या २५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोलशेत येथील लोढा-अमरा या इमारतीतील २५व्या मजल्यावर राहणारे अभिषेश शर्मा नवी मुंबईतील एका नामांकीत कंपनीमध्ये व्यवस्थापक होते. याच कंपनीमध्ये काम करणा-या सहकारी महिलेला ते महिनाभरापासून अश्लील संदेश पाठवत होते. यावर पिडीत महिलेनं कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून अभिषेश शर्माला अटक करण्यात आली होती. न्यायालयातून जामिन मिळाल्यानंतर अभिषेश घरी आले असता त्यांचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आई-वडीलही घरातच होते. या भांडणानंतर रात्री इमारतीच्या २५व्या मजल्यावरून उडी मारून अभिषेशनं आत्महत्या केली.