मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत मलवाहिनीवरील झाकणे उघडू नयेत तसेच नागरिकांनी पावसात चालताना काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोल्सची झाकणे पाण्याच्या दाबामुळे मॅनहोल्सपासून बाजुला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातुन काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजुला होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच त्वरीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.