भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते. गुरुवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३-३४ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या गौराईचे आपल्या घरी आगमन होणार आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आहे. शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी २-५५ वाजेपर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात असेपर्यंत गौराई आपल्या लाडक्या गणपती बाप्पाबरोबर आपला निरोप घेणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की २३ सप्टेंबर रोजी दुपारी २-५५ पर्यंत चंद्र मूळ नक्षत्रात आहे. तोपर्यंत विसर्जनाच्या अक्षता गौरीला अर्पण करून विसर्जन करायचे, नंतर गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाबरोबर प्रत्यक्ष विसर्जन करावयाचे, गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाचा आणि मूळ नक्षत्राचा काहीही संबंध नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली. गौराईचे स्वागत, उत्सव आपण आपल्या परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते. गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी, गणपतीची माता ‘पार्वती ‘होय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते म्हणून गौरी ‘धान्य लक्ष्मीच्या’ रूपात घरात प्रवेश करते. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीना पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. काही घरी परंपरेनुसार नैवेद्यात १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वाने असे पदार्थ असतात. १६ दीप प्रज्वलित करून आरती केली जाते. मातृका या १६ आहेत. म्हणून १६ अंकाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. तसेच १६ व्यावर्षापर्यंत मुली कुमारिका असतात. म्हणूनही १६ अंकाला महत्त्व आहे. आज गौरीपूजनाच्या निमित्ताने त्या गौरीबरोबरच घरातील स्त्रीच्या स्वास्थ्याकडे, प्रगतीकडे, तिच्या मनोबलाकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे असं पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी सांगीतलं
You must be logged in to post a comment.