लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रशासन कामाला लागलं असून जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता २ हजार वाहनांचा ताफा तैनात करावा लागणार आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा तिघांकडून आत्तापर्यंत अवघी दीडशे वाहनं जमा झाली आहेत. जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन मतदारसंघांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तयारी केली जात असून २ हजार वाहनं जमवण्याची जबाबदारी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागावर सोपवण्यात आली आहे. या विभागाकडून सध्या वाहनांची जुळवाजुळव सुरू आहे. जिल्ह्यातील सहाही महानगरपालिका, सर्व नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या ताफ्यातील १२३ वाहनं परिवहन विभागानं ताब्यात घेतली आहेत. निवडणुकीच्या कामासाठी ८३० बस, १०५ कार आणि मतपेट्यांसाठी ११५९ जीपसारख्या वाहनांची आवश्यकता आहे. सध्या प्रादेशिक परिवहन विभाग या वाहनांची जमवाजमव करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलं आहे. याकरिता अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.