कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा साजरा

चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा सर्वत्र साजरा करण्यात आला. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गुढीपाडवा साजरा करण्यामध्ये उत्साह नव्हता. महाराष्ट्रात गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून झाला. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलानं याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडलं आणि त्यांना सजीव केलं. याच सैनिकांच्या मदतीनं त्यानं शत्र्रुशी सामना केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. गुढीपाडव्याच्याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केलं होतं. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेनं घरोघरी उत्सव साजरा करत गुढ्या उभारल्या होत्या. आजही महाराष्ट्रात घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळं या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळालं. घराच्या अंगणात उभारलेली ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. यादिवशी कडुलिंबाची पानं चावून खाल्ली जातात किंवा जेवताना कडुलिंबाचे चूर्ण करून त्यात काळी मिरी, मीठ, हिंग, जिरे आणि ओवा हे पदार्थ मिसळून खाण्याचीही पध्दत आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस असल्यानं तो अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली. संवत्सर म्हणजे ज्यात ऋतू, महिने असतात, बारा महिन्यांचा काळ म्हणजे संवत्सर. संवत्सर ९ भागात विभागले गेले आहेत. पण प्रामुख्यानं लोक चंद्र संवत्सर मानतात. चंद्र संवत्सराचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेला होतो. याचदिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading