कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी उत्सव’ यंदा अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी 29 मार्च रोजीचा ‘होळी उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. होळीचा सण साजरा करताना मोठया प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणारे वायु प्रदुषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये तसेच माझे कुटूंब – माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत व्यैयक्तिकरित्या सुद्धा हा उत्सव करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.