ठाण्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात पायपीट करावी लागणार नाही. मुंबई विद्यापीठाचे ठाण्यामध्ये उपकेंद्र आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांना मुलभूत आणि प्रशासकीय सुविधांसाठी मुंबई विद्यापीठात पायपीट करावी लागत होती. त्यामुळं विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची भेट घेतली होती. ठाण्यातील उपकेंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला कुलसचिव अजय देशमुख यांनी लेखी स्वरूपात प्रतिसाद दिला आणि कालपासून काही सुविधा ठाणे उपकेंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत. पुनर्मूल्यांकन अर्ज, उत्तर पत्रिका छायांकित प्रत, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र आणि विद्यार्थी तक्रार निवारण अर्ज या सुविधांसाठी आता मुंबई विद्यापीठात पायपीट करावी लागणार नाही. या सुविधा ठाण्यातील उपकेंद्रातच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
