जिल्ह्यातील १५६ शिक्षक अतिरिक्त ठरल्यानं या शिक्षकांना आता नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जावं लागणार आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी कमी झाल्यानं १९४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन केलं जाणार होतं. परंतु या शिक्षकांना पुन्हा जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलं. या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया नुकतीच झाली. यामध्ये फक्त ३८ शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील खाजगी शाळांमधील रिक्त जागांवर करण्यात आले. उर्वरित १५६ शिक्षक समायोजनासाठी विभागीय स्तरावर पाठवण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यक्षेत्रातील पालघर अथवा रायगड जिल्ह्यामध्ये या १५६ शिक्षकांचे समायोजन करावे लागणार असल्यानं या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. या सर्व शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवू नये अशी मागणी शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी केली आहे.
