कोपरी वासियांचं टोलमुक्तीसाठी टोलनाक्यावर उपोषण

विरोधी पक्षात असताना टोल बंद करण्याच्या वल्गना करणारे आता सरकारमध्ये आहेत. तरीही टोलधाड सुरूच आहे. तेव्हा टोल लूटमार बंद करा अशा घोषणा देत टोल संघर्ष समितीच्या वतीनं पूर्व द्रूतगती महामार्गावरील आनंदनगर वेशीवर कोपरी वासियांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले. याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या सर्वपक्षीय आंदोलनात संघर्ष समितीचे प्रमुख संयोजक नगरसेवक भरत चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षामधील मंडळी उपस्थित होती. मुलुंडमध्ये जाता-येताना दोन्ही वेळा टोल भरावा लागतो. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा त्रासही कोपरीवासियांना भोगावा लागत आहे. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. राज्यामध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. मात्र ४ वर्ष पूर्ण होऊनही ठाण्यातील टोलनाके अद्याप सुरूच आहेत. हाकेच्या अंतरावरील हरिओमनगरमधील रहिवाशांना टोलमुक्ती मिळते मग कोपरीकरांना का नाही असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचा तर खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीचा टोल बंद करून नागरिकांना दिलासा दिला आहे मग पालकमंत्री ठाणेकरांना कधी न्याय देणार असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading