केंद्र सरकारने १९७० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कल्याण-मुरबाड-नगर रेल्वे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी मुरबाड रेल्वे कृती समितीने शरद पवार यांच्या पुढाकारानं ९० टक्के काम केलं होतं. कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प ही संकल्पना आमचीच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. कल्याण-नगर रेल्वेसाठी तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्याबरोबरच रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी, ममता बॅनर्जी, सुरेश प्रभु यांच्याबरोबर जागृत प्रवासी रेल्वे परिषदेनं चर्चा केली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून राज्य सरकारनं सहभाग घ्यावा अशी भूमिका मांडण्यात आली होती. राज्याच्या नियोजन आयोगानं यासाठी ५० कोटीची तरतूद करण्याची शिफारसही केली होती. मात्र त्यावेळी केंद्र सरकारनं नवे प्रकल्प न घेण्याचं धोरण स्वीकारल्यामुळं या प्रश्नाला खीळ बसली होती असं हिंदुराव यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विवेक सहाय यांचे १९७० च्या सर्वेक्षणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळं कल्याण-मुरबाड रेल्वेचं श्रेय हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचा दावा प्रमोद हिंदुराव यांनी केला. कोणीही कितीही वल्गना केल्या तरी ही कल्पना राष्ट्रवादीचीच असल्याचं प्रमोद हिंदुराव यांनी म्हटलं आहे. खासदार कपिल पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे हिंदुराव यांनी टीका केली आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/03/pramod-hindurao.jpg)