मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर दिला जाणार असून या संदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडप ते ठाणे या २३ किलोमीटर अंतराचे आठ पदरीकरण त्याचप्रमाणे शहापूर ते खोपोली या ९१ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ठाणे-वडप महामार्गासाठी १ हजार १८२ कोटी तर शहापूर, मुरबाड, कर्जत, खोपोली या मार्गासाठी ४५७ कोटी रूपये खर्च येणार आहे. जलवाहतुकीमुळे मुंबईच्या वाहतुकीचं चित्र निश्चितपणे बदललं जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये भिवंडी, कल्याण भागापर्यंत मेट्रोची आखणी झाल्याचं सांगून हीच मेट्रो पुढे बदलापूरपर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. टिटवाळा-मुरबाड अशा मोठ्या रस्त्याच्या जोडणीसाठी सुध्दा राज्य सरकार ५० टक्के वाटा उचलेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-25-at-4.31.13-PM.jpeg)