रेतीबंदर येथील झोपडपट्ट्यांचे रूपडे पालटणार असून आज या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाला. पारसिक चौपाटीसारख्या ऐतिहासिक प्रकल्पानंतर ठाणे महापालिका आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या सहकार्यानं रेतीबंदर येथील ८ झोपडपट्ट्या विविध आकर्षक रंगात न्हाऊन निघणार आहेत. या कामांतर्गत या परिसरात ५३ वीजेचे खांब बसवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे नाले दुरूस्ती, रस्ते, पायवाटा बनवणे, गटारं बांधणं, नाल्यांची साफसफाई अशा कामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. मिसाल मुंबई या संस्थेच्या वतीनं येथील झोपड्यांना रंगरंगोटी करण्यास सुरूवात झाली असून आता या सर्व झोपडपट्ट्या कात टाकायला लागल्या आहेत. डोंगरीपाडा, इंदिरानगर नंतर रेतीबंदर येथील ८ झोपड्यांना नवी झळाळी मिळणार आहे.