घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेप्रमाणेच ध्वज विनामूल्य उपलब्ध करावेत अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही संकल्पना राबवली आहे. या अंतर्गत प्रत्येकाने घर अथवा कार्यालयावर तिरंगा फडकवावा असं आवाहन शासकीय यंत्रणांकडून केलं जात आहे. मुंबई महापालिकेनं यासाठी ५० लाख ध्वज उपलब्ध करून दिले आहेत. ठाण्यातही हर घर तिरंगा मोहिम राबवण्यासाठी आवाहन केलं जात आहे. मात्र यासाठी विविध ठिकाणी ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये १७ लाख ध्वज लावण्याचं नियोजन आहे. मात्र हे ध्वज विकत घेण्याऐवजी मुंबई महापालिकेप्रमाणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास त्याला मोठा प्रतिसाद मिळू शकतो आणि यामुळे ग्रामीण, शहरी भागातील नागरिक उत्साहाने या मोहिमेत सहभागी होऊ शकतो. यासाठी घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी ध्वज विनामूल्य उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राजीव दत्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.