ठाणे पूर्व भागातील नागरिक आज सकाळी उग्र दर्पानं हैराण झाले होते. चेंदणी पूर्व कोळीवाडा परिसरात हा त्रास जास्त जाणवत होता. या उग्र दर्पामुळे डोकं दुखणं, मळमळ अशा तक्रारी केल्या जात होत्या. याबाबत प्रदूषण नियंत्रण कक्षास कळवण्यात आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांनी चेंदणी कोळीवाडा भागास भेट देऊन पाहणी केली. तसंच खाडीच्या पाण्याचे नमुने यावेळी घेण्यात आले.