कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्हयात असल्याने सार्वजनिक आणि खाजगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे,तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात. अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे,सर्व तलाव,कळवा मुंब्रा रेती बंदर,मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे गायमुख रेतीबंदर,घोडबंदर रेतीबंदर,उत्तन सागरी किनारा, ही स्थळे आहेत. मुरबाड तालुक्यातील सिध्दगड डोंगरनाव्हे,सोनाळे गणपती लेणी,हरिश्चंद्रगड,बारवीधरण परिसर,पडाळे डॅम,माळशेत घाटातील सर्व धबधबे,पळू,खोपवली ,गोरखगड,सिंगापुर नानेघाट,धसई डॅम,आंबेटेवे मुरबाड, ही स्थळे आहेत. शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ,कुंडन दहीगाव,माहुली किल्ल्याचा पायथा,चेरवली,अशोक धबधबा,खरोड,आजा पर्वत(डोळखांब)सापगांव नदीकिनारी कळंवे नदी किनारा,कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत. कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा,खडवली नदी परिसर,टिटवाळा नदी परिसर,गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत. भिवंडी तालुक्यातील नदीनाका,गणेशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत. अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर,धामणवाडी,तारवाडी,भोज,वऱ्हाडे,दहिवली ,मळीचीवाडी ही स्थळे आहेत. पावसामुळे वेगाने वाहणाच्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, वायु आणि जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी आणि सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात आज पासुन पुढील आदेश होईपर्यंत वरील बार्बीकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई कळविले आहे.