कोकण विभागाअंतर्गत २१ लाख मास्क असून आवश्यकता नसताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करू नये असं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त व्ही. पवनीकर यांनी सांगितलं. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारात मास्कच्या निर्माण झालेल्या कथित तुटवड्याबाबत एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मास्क वापरायची आवश्यकता असल्यास डॉक्टर मास्क लिहून देईल तेव्हाच मास्क दिला जाणार आहे. सॅनिटायझरच्या बाबतीतही सॅनिटायझरचा अति वापर केल्यास त्यातील अल्कोहोलमुळे हात कोरडे होऊ शकतात. दोनदा साबणाने हात धुतल्यावरही हाच फायदा होऊ शकतो असं यावेळी सांगण्यात आलं. कोकण विभागाअंतर्गत मास्क बनवणारे १५ उत्पादक असून सर्वांना मास्क आणि सॅनिटायझरचं उत्पादन वाढवण्याचं सांगण्यात आलं आहे. मास्कचा तुटवडा नसून मास्क आणि सॅनिटायझरचा अनावश्यक साठाही करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कोरोनाचा प्रकोप सध्या नसून सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नये असं आवाहनही व्ही. पवनीकर यांनी केलं आहे.