कळव्याच्या छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांना आता विनामुल्य भोजन

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी असलेल्या नातेवाईकांना आता विनामूल्य भोजनाची सुविधा उपल्बध करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. सुरुवातीला दुपारी १२ ते २ या काळात ही सुविधा उपलब्ध असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन सायं. ७ ते ९ या काळातही भोजनाची सुविधा देण्याचा विचार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सध्या सरासरी १५० ते २०० नातेवाईक या योजनेचा लाभ घेत आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठिकठिकाणचे रुग्ण येतात. प्रत्येकापाशी पुरेसे मनुष्यबळ नसते. त्यामुळे सोबतीला असलेल्या नातेवाईकावर चांगलाच ताण येतो. अशात त्याला जेवणाची चिंता अधिक त्रस्त करतेय. त्यातून मार्ग काढण्यासाठी अक्षय चैतन्य संस्थे पुढाकार घेतला. भायखळा येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात जेवण तयार केले जाते. मग मोठ्या डब्यातून ते संबंधित ठिकाणी पोहोचवले जाते. महापालिकेने त्यांना हॉस्पिटलच्या परिसरातीस रात्र निवारा इमारतीत तळमजल्यावर जेवण वाढण्यासाठी जागा दिली आहे. भात, डाळ, भाजी असे नेहमीचे जेवण असते. सुटीच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थाचाही जेवणात समावेश केला जातो. अन्नाची नासाडी होऊ नये, ते वाया जाऊ नये, या साठी संस्थेचे स्वयंसेवक काळजी घेतात. नातेवाईकांचा ताण हलका करण्यासाठी आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यातून विनामूल्य भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading