नागरिकांना बोलवण्यात गुंतवून ठेवून हातचलाखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणा-या एकूण १३ आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. बँकेत येणा-या वयोवृध्द नागरिकांना बोलण्यात गुंतवून नोटांसारख्या दिसणा-या कागदांचं बंडल देऊन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम काढून पसार होणे तसंच धार्मिक बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने काढण्यास सांगून पळून जाणे अशाप्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाल्यानं पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ४ पथकं स्थापन करण्यात आली होती. या चारही पथकांनी राजू शेट्टी, रमेशकुमार जयस्वाल, विलास दळवी, दिनेश सुराडकर, संजय महांगळे, महम्मद रफीक, गणेश ढोले, शार्बो नवलु इस्लाम, शंकर मुरूगेशन, प्रदीप पाटील, कृष्णकुमार सिंग, अर्जुन सलाट, अर्जुनभाई मारवाडी अशा १३ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ठाणे नगर पोलीस ठाण्यातील १२, कळवा पोलीस ठाण्यातील ५, नौपाडा पोलीस ठाण्यातील १४ आणि राबोडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे फसवणुकीचे ३२ आणि सोनसाखळी चोरीचे ८ असे एकूण ४० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आलं आहे. याप्रकरणी २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/12/WhatsApp-Image-2018-12-13-at-2.28.58-PM.jpeg)