दिवसातून फक्त दोन वेळा जेवा, अवघ्या तीन महिन्यात वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटीस दूर होईल अशी जाहीर हमी सध्या गाजत असलेले आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी दिली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती या विषयावर ते बोलत होते. कडक भूक लागेल तेव्हाच खा, दिवसातून फक्त दोन वेळाच जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झापासून काहीही खा, एक पदार्थ खा किंवा १० पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, दोनवेळच्या जेवणाची पध्दत स्वत:च ठरवा आणि ५५ मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा. कमी गोड खा आणि भरपूर पाणी प्या, दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये जर भूक लागली तर एखादा टोमॅटो खा, ४५ मिनिटं चाला असे मोलाचे सल्ले दिक्षीत यांनी यावेळी दिले. दिवसातून दोन वेळा जेवणाचा सुरूवातीला त्रास होईल पण ही पध्दत पाळली तर त्याची सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान ८ किलोनं कमी होईल. पोटाचा घेर दोन इंचानं कमी होईल, टाईप-२ चा डायबेटीस दूर होईल, ॲसिडीटी कायमची जाईल असंही डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी सांगितलं. आपल्याकडे नाश्ता करण्याची पध्दत नव्हती. ब्रिटीशांनी हा प्रकार आणला. अति खाण्याने लोकं मरतात पण उपाशी राहिल्याने कोणीही मरत नाही. आपण ६० दिवस उपाशी राहू शकतो असे दिक्षीतांनी सांगितलं. डायबेटिस रिव्हर्स सेंटरद्वारे दर गुरूवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत सहयोग मंदिर हॉल येथे मोफत सल्ला केंद्र सुरू केल्याची माहितीही डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी दिली. दिक्षीत यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी रसिकांनी अलोट गर्दी केली होती.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-12-at-4.30.25-PM.jpeg)