ठाण्यामध्ये दर तीन महिन्यांनी आता वृक्ष संमेलन होणार आहे. महापालिका आयुक्तांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. शहरात विविध ठिकाणी एप्रिलपर्यंत ३० हजार वृक्षांची लागवड करून त्यांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करणं, या वृक्षांची संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देणं आणि दर तीन महिन्यांनी वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात महापालिकेच्या किंवा खाजगी संस्थेच्या जागेवर कोणतीही तीन उद्यानं महापालिकेच्या निधीतून नव्यानं विकसित करणं, ठाण्यातील सर्व उड्डाणपूलाखालील मोकळ्या जागेचं सुशोभिकरण करणं, ठाणे महापालिकेच्या मुख्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या हरित भिंतीप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी तीन महिन्यांच्या कालावधीत १० हजार चौरस फूटावर हरित भिंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले. ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित एकूण ४२३ वृक्ष तोडण्यात येणार असून या वृक्षांच्या बदल्यात ८ ते १० फूट उंचीचे ६ हजार २७० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा पोखरलेले, किड लागलेले, मृत झालेले वृक्ष काढून त्या जागी नवीन वृक्ष लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/IMG-20190122-WA0017.jpg)