ठाणे नगर आणि कळवा पोलीसांनी चोरीला गेलेल्या २१ दुचाकी गाड्या हस्तगत केल्या आहेत. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ठाण्यामध्ये वाहनं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळं ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविकांत मालेकर आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दुचाकी चोरी होत असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करून सापळे लावले होते. १ फेब्रुवारीला पोलीस नाईक रोकडे आणि पोलीस शिपाई बच्छाव हे गस्त घालत असताना राजा शेखला डुप्लिकेट चाव्या आणि स्क्रू ड्रायव्हरसह सिडको बसस्टँडला पकडण्यात आलं. त्याच्याकडून त्याचा साथीदार गना पठाण याची माहिती मिळाली. या दोघांकडून सव्वा चार लाखांच्या ११ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या. गना पठाण हा व्यवसायानं मेकॅनिक असून तो दुचाकी चोरल्यानंतर नंबरप्लेट आणि काही वाहनांच्या इंजिन नंबरमध्ये फेरफार करून १० ते १५ हजाराला दुचाकी विकत असे. कळवा पोलीस ठाण्याचे शिपाई ढेबे यांनी प्रकाश जुवळेला संशयितरित्या फिरताना पकडलं. त्याच्याकडे वाहन चोरीसाठी लागणारे साहित्य मिळाले. त्याच्या सखोल चौकशीत १० लाखांच्या १२ गाड्या चोरल्याचं कबूल केलं. हा गाड्या विकताना आरटीओ कार्यालयात जमा केलेल्या गाड्या आपण सोडवून घेतो आणि त्या रिपेअर करून विकतो असं सांगत असे. ५० ते ६० हजाराची गाडी कुणी १० ते १५ हजाराला विकत असेल तर अशा गाड्या विकत घेऊ नका. अशी लोकं गाडी विकत घेण्यासाठी आल्यास पोलीसांना कळवा असं आवाहन पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी केलं आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/02/WhatsApp-Image-2019-02-12-at-12.47.53-PM.jpeg)